मुंबई : कोल्हापूर, सांगलीत निर्माण झालेल्या अभूतपूर्व अशा पुरातून आतापर्यंत चार लाख २४ हजार ३३३ जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापुरातील दोन लाख ३३ हजार १५०, तर सांगलीतील एक लाख ४४ हजार ९८७ नागरिकांचा समावेश आहे. शासनाचे आपत्ती नियंत्रण कक्ष, स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह राज्य व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल (एनडीआरएफ), लष्कर, नौदल, वायुदल, तटरक्षक दल आदींचे जवान बचावकार्य करत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमचे नौदलाचे १५ जणांचे पथकही बोटींसह शिरोळकडे (जि. कोल्हापूर) रवाना झाले असल्याची माहिती मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाने दिली.
कोल्हापूर जिल्ह्यात ७४ बोटींद्वारे, तर सांगली जिल्ह्यात ९३ बोटींद्वारे मदतकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासनाबरोबरच सांगली, कोल्हापूर येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची २३, तसेच नौदलाची २६, तटरक्षक दलाची सांगलीमध्ये दोन व कोल्हापुरात नऊ, सैन्यदलाची आठ, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाची सांगलीत दोन तर कोल्हापुरात एक अशी पथके कार्यरत आहेत. याशिवाय विशाखापट्टणमचे १५ जणांचे नौदलाचे पथक बोटींसह शिरोळकडे रवाना झाले आहे.
नागरिकांना तात्पुरता निवारा म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात १८७, तर सांगली जिल्ह्यात ११७ केंद्रे उभारण्यात आली आहेत. तेथील लोकांना स्वच्छ पाणी, जेवणाची व्यवस्था, औषधोपचार उपलब्ध करून दिले जात आहेत. कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ४३ हजार ९२२ जनावरांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
बाधित गावे व कुटुंबेकोल्हापूर जिल्ह्यातील पूरबाधित गावे २४९ असून, बाधित कुटुंबांची संख्या ४८ हजार ५८८ आहे. सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावे १०८ असून, बाधित कुटुंबांची संख्या २८ हजार ५३७ एवढी आहे.
पूरपरिस्थितीबद्दल राज्य शासनाने केंद्र शासनाशी संपर्क साधल्यामुळे सैन्य दलाची व तटरक्षक दलाची पथके कार्यरत झाली आहेत. मदत व पुनर्वसन विभागाचे आपत्ती नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत असून, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा वेळोवेळी घेण्यात येत आहे.
मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षातील हेल्पलाइनवर आणि सोशल मीडियावर आलेल्या संदेशांना तत्काळ प्रतिसाद देऊन स्थानिक प्रशासनाला सूचना देऊन पूरग्रस्तांना मदत करण्यात येत आहे.
‘पंचगंगेची पातळी घटली’‘पंचगंगा नदीची पातळी सुमारे साडेतीन फुटांहून अधिक घटली असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. ‘शिरोळमधील गावांसाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, नौदल, तटरक्षक दलाच्या एकूण ४५ बोटी आणि पथकांसह मदत पोहचवून, त्यांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
अलमट्टीतून पाच लाख क्युसेक विसर्ग सुरू
कर्नाटकातील अलमट्टी धरणातून पाच लाख क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित चार दरवाजे खुले आहेत. त्यामधून ७११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता कोयना धरणामधून ७७ हजार ९८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.
राज्यातील इतर बाधित गावेकोल्हापूर शहरासह एकूण ६९ तालुके आणि ७६१ गावे पुरामुळे बाधित झाली आहेत.
सातारा : ११८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ९२२१), ठाणे : २५ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : १३१०४), पुणे : १०८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : १३,५००), नाशिक : ५ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ३८९४), पालघर : ५८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : २०००), रत्नागिरी : १२ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ६८७), रायगड : ६० गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ३०००), सिंधुदुर्ग : १८ गावे (बचाव केलेल्या व्यक्ती : ४९०)
नवजात अर्भके आणि गर्भवती स्त्रियांची सुटका‘एनडीआरएफ’च्या जवानांनी १० ऑगस्ट रोजी करनूर, कागल (जि. कोल्हापूर) येथील काही गर्भवती स्त्रिया, तसेच नवजात अर्भकांना सुरक्षितपणे एम. जी. हॉस्पिटलमध्ये पोहोचविले. विनंती गणेश धुंके (२२), सुनंदा अंबाजी कांबळे (२०), अना फिरोझ पठाण (२२) या गर्भवती स्त्रियांचा त्यात समावेश होता. शीतल सुनील या वीस वर्षांच्या महिलेने १० ऑगस्टला सकाळी घरीच बालकाला जन्म दिला. तिलाही बाळासह हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आल्याची माहिती ‘एनडीआरएफ’कडून देण्यात आली.
(‘एनडीआरएफ’च्या जवानांकडून सुरू असलेल्या बचावकार्याचे व्हिडिओ शेवटी दिले आहोत.)
खालील शीर्षकांवर क्लिक करून, अधिक माहिती घेऊन तुम्हीही पूरग्रस्तांना मदत पोहोचवू शकता.